एन. रघुरामन यांचा कॉलम:आणीबाणीच्या परिस्थितीत घाबरण्याऐवजी संयम निवडा
गेल्या आठवड्यात सोमवार ते बुधवारदरम्यान हजारो किलोमीटर अंतरावरील दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन घटना घडल्या. एक मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये तर दुसरी जपानच्या क्यूशू बेटावर. भोपाळला मान्सूनचे दाट ढग जमले होते, ज्यात जपानमधील चिंताग्रस्त वातावरणाची झलक दिसत होती. “किसान क्रांती यात्रे’अंतर्गत शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे भोपाळचा मुख्य रस्ता पूर्णपणे जाम झाला होता. अचानक शाळा बंद झाल्या. पालक त्रस्त होते. गुदमरून टाकणाऱ्या उकाड्याने प्रत्येक कारचालक हैराण होता. होशंगाबादचा मुख्य रस्ता पूर्ण बंद होता. कुणाला बिझनेस प्रेझेंटेशन द्यायचे होते, तर कुणाला वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी घरी पोहोचायचे होते. पण कुणीही एक इंचही पुढे सरकू शकले नाही. अनेक जण फोनवर सतत येणाऱ्या नोटिफिकेशनमध्ये अडकले होते. काही जण स्टिअरिंगवर हात आपटून सतत हॉर्न वाजवत होते. काहींसाठी ही परिस्थिती असह्य असल्याने ते खिडकीच्या काचा खाली करून ट्रॅफिक जामला शिव्याशाप देऊ लागले. काहींनी जवळच्या छोट्या गल्ल्यांत घुसून भोपाळ-जबलपूर महामार्गापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण या प्रक्रियेत त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत होऊ शकणारी वाहतूकही रोखली. मोठी वाहने त्या गल्ल्यांत वळू शकत नसल्याने दुचाकीही अडकल्या. मीही त्याच ट्रॅफिक जाममध्ये होतो. अनेकांनी कारचालकांना संयम राखण्याचे आवाहन केले. पण सर्वांनाच लवकर घरी पोहोचायचे होते. या गोंधळात कुणीही वेळेवर पोहोचले नाही. या अधीरतेचा परिणाम असा झाला की काही लोकांना मित्र किंवा नातेवाइकांच्या घरी रात्र काढावी लागली, वास्तविक पाहता भोपाळ हे दिल्लीपेक्षा खूपच लहान शहर आहे. गेल्या मंगळवारी नेमक्या याच वेळी जपानच्या दक्षिणेकडील बेटावर 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. 1500 हून अधिक इमारतींचे नुकसान झाले, त्यापैकी 179 पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. अनेकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. सुमारे 80 हजार घरे पाणी आणि विजेशिवाय होती. अनेक जण 24 ते 48 तास झोपले नाहीत. ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, ते चिंतेत होते. संकटावेळी माणसाची प्रवृत्ती असते की तो गोंधळून माहिती मिळवण्यासाठी ओरडतो, पुढे जाऊन समस्या कशी सोडवली जाऊ शकते, हे पाहतो. तो आपल्या कुटुंबासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण बेटावरील त्या उद्ध्वस्त भागातही अनेक लोक अन्न-पाण्यासाठी रांगेत उभे नव्हते, तर ज्यांची घरे पूर्णपणे तुटली होती किंवा जे भुकेले होते, त्यांच्यापर्यंत स्वयंसेवक म्हणून अन्न-पाणी पोहोचवण्यासाठी उभे होते. रांगेत उभ्या अनेकांच्या पायात वेदना होत होत्या. त्यांना त्यांच्या बुटांखाली अजूनही भूकंपाचे धक्के जाणवत होते, पण तरीही ते आपल्या जागी उभे राहिले. हेच त्याच्या सर्वात शुद्ध स्वरूपात “गामन’ होते. “गामन’ ही एक प्रमुख जपानी सांस्कृतिक संकल्पना आहे. याचा अर्थ – सामाजिक सलोखा राखण्यासाठी आपल्या वैयक्तिक वेदना, राग किंवा तक्रारी लपवून ठेवणे. नैसर्गिक आपत्ती, अडचणी किंवा दुःखांचा शांततेने आणि धैर्याने सामना करणे. समाज आणि राष्ट्राच्या गरजांना आपल्या वैयक्तिक दुःखापेक्षा वर ठेवणे. कुठेतरी आपण सगळे असेच लहानाचे मोठे झालो आहोत की आपल्याला त्वरित समाधान हवे असते किंवा याला “टू मिनिट्स नूडल्स जनरेशन’ असेही म्हणता येईल. पण आपण आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांना “गामन’चे हे धडे नक्की शिकवले पाहिजेत. यामुळे त्यांची चिंता कमी होण्यास मदत होईल आणि ते आणीबाणीच्या परिस्थितीतही शांत राहायला शिकतील.
फंडा असा की, जेव्हा पायाभूत सुविधा कोलमडतात किंवा समाज थांबतो, तेव्हा खरी ताकद यावरून मोजली जात नाही की तुम्ही आणि मी किती लवकर घरी पोहोचलो. ती त्या शांत क्षणांमध्ये दिसून येते, जेव्हा आपल्यासारखे सामान्य लोक घाबरून जाण्याऐवजी संयम आणि वैयक्तिक निराशेपलीकडे जाऊन सामूहिक जबाबदारी निवडतात.
