August 30, 2026

एन. रघुरामन यांचा कॉलम:दुःखाच्या जाणिवेतूनच खरा शहाणपणा घडतो

0
thnfd8_1787081616.jpg

आपल्यापैकी अनेकांनी वैद्यकीय परिस्थितीवर आधारित एखादा चित्रपट किंवा मालिका नक्कीच पाहिली असेल. यात बाळंतपणानंतर स्त्रीला अचानक ‘पोस्टपार्टम हॅमरेज’ (पीपीएच) होतो. म्हणजेच प्रचंड रक्तस्राव सुरू होतो. ही स्थिती जीवघेणी ठरू शकते. ‘ग्राम चिकित्सालय’ ही अशीच एक मालिका आहे. या मालिकेत प्रभात नावाचा एक तरुण, हुशार व ध्येयवादी डॉक्टर झारखंडमधील ‘भटकंडी’ या दुर्गम उपेक्षित प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी स्वीकारतो. तेथे गरजेचे बदल घडवून आणण्यासाठी तो ठाम असतो. पण इतर काही बदलण्यापूर्वी त्याला आधी स्वतःमध्येच बदल करावा लागेल याची जाणीव त्याला तिथे होते. अशा मालिकांमध्ये कलाकार दिग्दर्शकाने सांगितलेली भूमिका वठवतात आणि लेखकाने लिहून दिलेले संवाद बोलतात. आपल्यासमोर अशी काही परिस्थिती आली तर आपणही तसेच वागू, अशी आपलीही इच्छा असते. पण महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील ‘घोडनकप्पी’ या दूरवरच्या आदिवासी पाड्यातील तुळशीराम गेडाम या रहिवाशाने केलेल्या गोष्टीचा विचार कोणत्याही लेखकाने किंवा दिग्दर्शकाने कधी पडद्यावर दाखवण्यासाठी केला नसेल. यालाच एका तरुण बापाचे ‘खरे शहाणपण’ म्हणतात. शहाणपण ही नेहमी वयानुसारच येते असे नाही, हेच त्यांनी सिद्ध केले. अनेकदा ही परिपक्वता खोल आघात झाल्यावर येते. यातून माणसाचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. 14 जून रोजी गरोदरपणाच्या 33 व्या आठवड्यात (सामान्यपणे बाळंतपण 40 व्या आठवड्यात होते) तुळशीराम यांच्या 25 वर्षांच्या पत्नी संगीता यांनी घरीच एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्यांना पीपीएचचा त्रास सुरू झाला. कुटुंबाने तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधला. जिथपर्यंत पोहोचणे शक्य होते तिथपर्यंत म्हणजेच गावाजवळील टेकडीपर्यंत तातडीने रुग्णवाहिका पाठवण्यात आली. नातेवाईक त्या महिलेला घेऊन खडतर रस्त्यांवरून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत राहिले. या संघर्षात वैद्यकीय भाषेत ज्याला ‘गोल्डन अवर’ म्हणतात, तो अत्यंत महत्त्वाचा वेळ निघून गेला. संगीता यांच्यावर उपचार सुरू होण्यापूर्वीच प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. सुमारे 2.2 किलो वजनाच्या नवजात बाळाची प्रकृती मात्र स्थिर असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रसंगी अनेक लोक तिथेच थांबले असते. काहींनी सरकारला दोष दिला असता. काहींनी विरोध केला असता, काहींनी भरपाई मागितली असती. काही जण स्वाभाविकपणे दुःखात बुडून घरी निघून गेले असते. पण तुळशीराम यांनी एक वेगळा आणि अत्यंत कठीण मार्ग निवडला. आपल्या कुटुंबावर आलेली वेळ इतर कोणत्याही कुटुंबावर येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला. हा विचार अत्यंत खोल आहे. आपले वैयक्तिक दुःख समाजाच्या भल्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी एका विशेष परिपक्वतेची गरज असते. जेव्हा हे दुःख सहन करणारी व्यक्ती खूप तरुण असते तेव्हा ही गोष्ट अधिक कौतुकास्पद ठरते. तुळशीराम यांच्याकडे वेळेची अनुकूलता नाही. आरामदायी आयुष्य नव्हते. त्यांना दोन लहान मुलांचा सांभाळ करायचा आहे. शिवाय अशी जबाबदारी वाटून घेणाऱ्या जोडीदाराला त्यांनी गमावले आहे. दुःखात बुडून राहण्यासाठी त्यांच्याकडे प्रत्येक कारण उपलब्ध आहे. पण असे असूनही त्यांनी इतर कोणाच्या तरी पत्नीचा, कोणाच्या तरी बाळाचा आणि कोणाच्या तरी आपत्कालीन परिस्थितीचा विचार करण्यास सुरुवात केली. खरे शहाणपण इथूनच सुरू होते. रस्ता हा केवळ एक रस्ता नसतो हे तुळशीराम यांच्या लक्षात आले. घोडनकप्पी येथील 20 कुटुंबांसाठी हा रस्ता रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचे एक माध्यम आहे. हा रस्ता एखाद्या गरोदर महिलेची सुरक्षा आहे. एखाद्या मुलाचा शाळेचा मार्ग आहे आणि एखाद्या वृद्धाचा स्वाभिमान आहे. आपत्कालीन परिस्थिती आणि दुर्दैवी अपघात यातील फरक म्हणजे हा रस्ता आहे. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने मुख्य रस्त्यापर्यंत 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरू केले. स्वेच्छेने केलेल्या श्रमदानातून 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून हे काम सुरू झाले. आता रस्त्याचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. फंडा असा की- आपण अनेकदा शहाणपणाचा संबंध पांढरे झालेले केस, अनेक वर्षांचा अनुभव आणि आयुष्याबद्दलची भाषणे यांच्याशी जोडतो. पण कदाचित शहाणपण यापेक्षा खूप सोपे असते. स्वतःच्या दुःखातून शिकणे आणि तेच दुःख दुसऱ्या कुणाच्या नशिबी येऊ नये याची काळजी घेणे म्हणजेच खरे शहाणपण होय.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!