एन. रघुरामन यांचा कॉलम:लवकर निवृत्ती घेणे कुठे महागात पडू नये!
तरुण वयात आमच्या मित्रांमध्ये अर्ली रिटायरमेंटची मोठी क्रेझ होती. कठोर परिश्रम कसे करावेत, पुरेशी बचत कशी करावी आणि वयाच्या 50 व्या वर्षीच सर्व काही सोडून मोकळे कसे व्हावे, यावर आम्ही तासनतास चर्चा करायचो. उर्वरित आयुष्य प्रवास, आराम व स्वतःचे छंद जपण्यात घालवायचे, असे स्वप्न होते. आमच्यापैकी काही मित्रांनी हे वचन पाळलेही. पण, ज्यांनी सरकारी नोकऱ्या केल्या, त्यांचा दृष्टिकोन बदलला. अनेक मित्र असेही होते ज्यांना रिटायर व्हायचे होते, पण पुरेशी बचत करू शकले नाहीत. काही मित्रांनी ही इच्छा पूर्णही केली. जसे की सैन्यातून आलेले सोबती किंवा परदेशातून परतलेले मित्र. तरीही त्यांच्या लवकरच लक्षात आले की ‘कामाशिवाय अखंड आराम’ ऐकायला जितका चांगला वाटतो, प्रत्यक्षात सुखद नसतो. आता आमच्यापैकी बहुतांश लोक महिन्यातून दोन आठवडेच आराम करतात, बाकीच्या दिवसांत छंद व कमाईही करून देईल असे काहीतरी काम करतात. रिटायरमेंटच्या सुरुवातीच्या काही महिन्यांनी दाखवून दिले की, लवकर रिटायरमेंट चांगल्या फायनान्शियल प्लॅनिंगला रुळावरून घसरवू शकते. महागाई हे यामागचे मोठे कारण आहे. ही महागाई खाण्यापिण्याच्या वस्तूंपुरती मर्यादित नाही. वैद्यकीय, विमा, वीज-पाण्याचा खर्च, प्रवास, घरगुती मदत व मालमत्तेची देखभाल हे सर्व महाग झाले आहे. दशकापूर्वी जी पुंजी पुरेशी होती, ती कमी पडू लागली आहे. त्यातच लोकांचे आयुष्यमानही आता पूर्वीपेक्षा वाढले आहे. म्हणूनच आमच्यापैकी बहुतेकांनी कन्सलटिंग, मेंटरिंग, अध्यापन, लेखन, शेती किंवा लहान स्टार्टअपचा मार्ग निवडला आहे. रिटायरमेंटनंतर मिळणारे थोडेसे उत्पन्नही बचतीवरील ताण कमी करते आणि गुंतवणुकीला वाढण्याची संधी देते. मी थोडा वेगळा मार्ग निवडला. मित्रांकडून प्रेरित होऊन मी नामांकित संस्थांमधून काही कोर्स केले. सतत शिकल्याने कामाचे ‘मूल्य’ वाढते, हे समजले. संशोधनातून समोर आले की, जे लोक मानसिक,सामाजिकदृष्ट्या सक्रिय असतात, ते पूर्णपणे सर्व सोडणाऱ्या लोकांच्या तुलनेत चांगल्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद घेतात. म्हणूनच, आवडीच्या गोष्टी करताना महिन्यातून काही दिवस काम नक्की करा. मॅनेजमेंट टिप : वाहवा मिळवण्यासाठी लवकर निवृत्तीची चूक करू नका. शरीराला गरज असेल तेव्हाच विश्रांती घ्या. तोपर्यंत तुमचा अनुभव पैसे कमावण्याचे साधन नाही, तर आयुष्यात प्रतिष्ठा व शांततेने परिपूर्ण दीर्घायुष्य देणारे माध्यम बनले पाहिजे.
