एन. रघुरामन यांचा कॉलम:भारतीय पालकत्व कोणत्याही पाश्चात्त्य शैलीपेक्षा अधिक चांगले असू शकते का?
अमेरिकेत 4 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांवर वर्षभर चाललेल्या एका प्रदीर्घ अभ्यासात असे आढळून आले आहे की, जेव्हा श्वेतवर्णीय मुले टीव्ही कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या वंशाच्या लोकांना एकत्र पाहतात, तेव्हा त्यांच्या मनात कुणाबद्दलही भेदभाव निर्माण होत नाही. या सोमवारी जर्नल ऑफ अमेरिकन सायकॉलॉजिस्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका न्यूज रिपोर्टनुसार, ज्या टीव्ही कार्यक्रमांमध्ये वर्गभेद दिसून येतो, म्हणजेच मुख्य पात्रे शाही घराण्यातील असतात आणि सहायक पात्रांना त्यांच्यापेक्षा कमी श्रीमंत किंवा कमी समजदार दाखवले जाते, त्यामुळे मुलांमध्ये भेदभाव विकसित होऊ शकतो. या बातमीने मला बालपणाची आठवण करून दिली, जेव्हा आमचे पालक वेगवेगळ्या क्षेत्रांच्या आणि परंपरांच्या अशाच गोष्टी सांगायचे. या कथांमध्ये तीच कालातीत शिकवण असायची, जी आजच्या आधुनिक संशोधनातही सांगितली जाते. भेदभाव मिटवणाऱ्या अशाच काही कथा येथे सादर केल्या आहेत. मोठे झाल्यावर श्रीकृष्ण द्वारकेचे राजे झाले, तर सांदीपनी ऋषींच्या आश्रमात त्यांच्यासोबत शिकणारे सुदामा गरिबीत जीवन जगत होते. एक दिवस अतिशय संकोचाने सुदामा कृष्णाला भेटायला पोहोचले आणि त्यांच्याकडे फक्त पोह्यांची पुरचुंडी होती. कृष्णाने अत्यंत प्रेमाने त्यांचे स्वागत केले, गळाभेट घेतली आणि त्यांना अति-सन्मानित अतिथीचा दर्जा दिला. सुदाम्याला लाज न वाटू देता कृष्णाने शांतपणे आपल्या मित्राचे आयुष्य बदलून टाकले. आपण शिकलो : मैत्री संपत्तीपेक्षा मोठी असते. वृद्ध आदिवासी महिला शबरीने वर्षानुवर्षे प्रभू रामांची प्रतीक्षा केली. राम येतील या आशेने ती दररोज जंगलातील रस्ता साफ करत असे. जेव्हा राम आले, तेव्हा तिने प्रेमाने प्रत्येक बोर आधी चाखून पाहिले, जेणेकरून ती त्यांना सर्वात गोड फळे देऊ शकेल. रामानेही ती आनंदाने स्वीकारली, कारण त्यांच्यासाठी ते प्रेम कोणत्याही शाही भोजनापेक्षा अधिक मौल्यवान होते. आपण शिकलो : प्रेमाला कोणतीही मर्यादा नसते. आठवून पाहा, हस्तिनापूरमध्ये दुर्योधनाच्या भव्य भोजनाच्या निमंत्रणानंतरही कृष्ण विदुराच्या साध्या घरी गेले. तिथे विदुराची पत्नी इतकी भावविभोर झाली की तिने फळांऐवजी केळीची सालेच वाढली. कृष्ण हसले आणि त्यांनी तीही स्वीकारली, कारण ती खऱ्या प्रेमाने वाढली होती. आपण शिकलो : प्रेमाने भरलेले घर महालापेक्षा अधिक समृद्ध असते. सत्यकामला ऋषी गौतम यांच्या गुरुकुलात शिकायचे होते. जेव्हा सत्यकामला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने प्रामाणिकपणे सांगितले की त्याच्या वडिलांबद्दल त्याच्या आईला काहीही माहिती नाही. त्याच्या सत्यवचनाने प्रभावित होऊन ऋषींनी म्हटले की, इतके प्रामाणिक शब्द एखादी श्रेष्ठ व्यक्तीच बोलू शकते आणि त्यांनी त्याला आपला शिष्य बनवले. आपण शिकलो : प्रामाणिकपणा हीच तुमची सर्वात मोठी ओळख आहे. संत रविदास बूट बनवून आपली उपजीविका चालवत असत, ज्याला अनेक लोक छोटे काम मानायचे. परंतु त्यांची बुद्धिमत्ता, विनम्रता आणि भक्तीने त्यांना भारतातील महान संतांपैकी एक बनवले. राजा, राणी आणि विद्वान त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असत, कारण ते संतांच्या चारित्र्याचा सन्मान करत होते, त्यांच्या व्यवसायाचा नाही. आपण शिकलो : प्रत्येक व्यवसाय सन्मानास पात्र आहे. गुजरातचे लाडके संत-कवी नरसी मेहता यांनी देव आणि मानवतेप्रति समर्पित असे साधे जीवन व्यतीत केले. त्यांचे प्रसिद्ध भजन ‘वैष्णव जन तो’ शिकवते की श्रेष्ठ तोच आहे, जो दुसऱ्याचे दु:ख समजतो आणि कोणत्याही स्तुतीची किंवा पुरस्काराची अपेक्षा न करता त्याची मदत करतो. त्यांच्या जीवनाने अनेक पिढ्यांना प्रत्येक माणसाप्रति करुणा बाळगायला शिकवले. आपण शिकलो : दुसऱ्याच्या वेदना समजून घ्या. भगवान विठ्ठलाचे निस्सीम भक्त असूनही संत चोखामेळा यांना भेदभाव सहन करावा लागला आणि सामाजिक परंपरांमुळे त्यांना अनेकदा मंदिरात प्रवेश दिला जात नसे. तरीही त्यांनी आपली श्रद्धा सोडली नाही. त्यांची भक्तिगीते इतकी प्रभावशाली ठरली की आजही पंढरपूर वारीचे लाखो भाविक ती गातात. आपण शिकलो : भक्तीला कोणतीही जात नसते. राजा रंतिदेव यांची कथा सांगते की, अनेक दिवस उपाशी राहिल्यानंतरही त्यांनी आपले अन्न इतरांना दिले. त्यांचे असे मानणे होते की, गरजवंतांची सेवा हीच सर्वात मोठी पूजा आहे. आपण शिकलो : तुमच्याकडे थोडे असले तरी ते वाटा आणि दयेला कोणताही दर्जा नसतो. फंडा असा की, जर आपण मुलांना झोपण्यापूर्वी या कथा पुन्हा ऐकवू लागलो, तर खात्रीने आपण नेहमी जगातील सर्वात चांगले पालक बनून राहू.
