August 31, 2026

एन. रघुरामन यांचा कॉलम:वेगळी स्वप्ने पाहा, छोट्या वस्त्याही बदलतील

0
nraghuraman_1788114306.jpg

या शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनऊच्या डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘बदलाचे दूत’बनण्याचे आणि ‘टीम इंडिया’साठी काम करण्याचे आवाहन केले. हा केवळ औपचारिक पदवी प्रदान समारंभाचा उपदेश नव्हता. राष्ट्रउभारणीसाठी नेहमीच एखाद्या गगनचुंबी इमारतीमधील कॉर्नर ऑफिस, एखादे मोठे पद किंवा बड्या शहरांतील मोठ्या संस्थांचीच गरज नसते. याची आठवण ते देशातील तरुण वर्गाला करून देत होते. कधीकधी यासाठी फक्त एका व्यक्तीची गरज असते. ती स्वतःच्या मूळ भूमीसाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याचे ठरवते. मग ती जागा छोटी का असेना. विपुल खिराडी हा एक तरुण आदिवासी आहे. गावाला जगाच्या नकाशावर ओळख मिळवून देण्याचे स्वप्न त्याने पाहिले. नाशिकपासून 100 किमी अंतरावर वसलेले ‘उदमल’असे या आदिवासी गावाचे नाव आहे. हे गाव अधिकृतपणे राज्यातील पहिली ‘डार्क-स्काय कम्युनिटी’ बनणार आहे. यामुळे महाराष्ट्राचे आकाश ताऱ्यांनी अधिक उजळून निघेल. जिल्हा प्रशासनाने जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी 42.1 लाख रुपये मंजूर केले आहेत. रात्रीचे नैसर्गिक आकाश जपणे आणि खगोल-पर्यटन विकसित करणे हा यामागचा उद्देश आहे. प्रकाश प्रदूषण कमी करणे, खगोल-पर्यटनाला चालना देणे व स्थानिक आदिवासींसाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या प्रकल्पाचा थेट हेतू आहे. प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी आणि वैज्ञानिक पद्धतीने बाहेरील दिवे लावण्यासाठी गावकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. त्यामुळे गावातील दिवे स्मार्ट व योग्य दिशेने प्रकाश देणारे झाले आहेत. यामुळे रात्रीच्या आकाशाला कमी अडथळा ठरताे. उदमल हे गाव ‘डार्क-स्काय इंटरनॅशनल’कडून महाराष्ट्रातील पहिली अधिकृत ‘डार्क-स्काय कम्युनिटी’ म्हणून मान्यता मिळवण्याच्या प्रक्रियेत आहे. या सगळ्याची सुरुवात विपुलपासून झाली. त्याने आकाशातील तारे पाहिले, तेव्हा स्वतःच्या गावाला मागे सोडून जाण्याचे स्वप्न पाहिले नाही. उलट याच ताऱ्यांच्या बळावर आपल्या गावाला नवी ओळख मिळवून देण्याचे स्वप्न त्याने पाहिले. अवघ्या 14 वर्षांचा असताना एकलव्य निवासी शाळेत शिकताना विपुल एका तारे-निरीक्षण कार्यक्रमात सहभागी झाला होता. या अनुभवाने त्याच्या गावाभोवती पसरलेल्या अंधाराकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला. काही वर्षांनंतर मनाली येथे एका खगोलशास्त्र परिषदेला जाताना त्याच्या मनात विचार आला : उदमल गाव जागतिक खगोल-पर्यटनाचा भाग का बनू शकत नाही? एका अज्ञात आदिवासी गावातील तरुणासाठी हा अत्यंत धाडसी विचार होता. पण तो मागे हटला नाही. शहरांमधून अनेक गोष्टी वेगाने नामशेष होत होत्या. तीच गोष्ट उदमलकडे आधीपासून होती. नैसर्गिक काळेकुट्ट आकाश. विपुलने गावकऱ्यांना समजावून सांगितले की, ‘डार्क-स्काय’ जपणे म्हणजे अंधारात राहणे नव्हे. याचा अर्थ जबाबदारीने प्रकाशाचा वापर करणे आणि गावाची खरी ओळख असलेला अंधार सुरक्षित ठेवणे हा आहे. शेवटी गावकऱ्यांनी ही कल्पना स्वीकारली. प्रशासनही सोबत आले. आज उदमल हे महाराष्ट्रातील पहिले डार्क-स्काय गाव बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने विकसित होत आहे. टेलिस्कोप, स्काय-क्वालिटी मीटर आणि इतर सुविधांसाठी सरकार निधी देत आहे. यातील विशेष गोष्ट केवळ खगोल-पर्यटन प्रकल्प नाही, तर त्यामागील विचार आहे. विपुलने आपल्या दुर्गम गावाला स्वतःची मर्यादा मानले असते. पण त्याने त्याकडे एक संधी म्हणून पाहिले. राजनाथ सिंह अगदी याच भावनेबद्दल बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते की, समस्या केवळ ओळखू नका, तर त्यावर उपाय शोधा. स्वतःचा प्रभाव निर्माण करा आणि नोकरी शोधण्याऐवजी नोकरी देणारे बना. या दोन्ही गोष्टी वेगळ्या वाटू शकतात. एकीकडे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करणारे संरक्षणमंत्री व दुसरीकडे स्वतःच्या गावात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणारा भौतिकशास्त्राचा तरुण विद्यार्थी. पण दोघांचा संदेश एकच आहे. भारतात अशी हजारो गावे, छोट्या वस्त्या आणि समुदाय आहेत. ते काही वाईट घडल्याशिवाय राष्ट्रीय पटलावर कधीच येत नाहीत. पण त्या प्रत्येकात कोणती ना कोणती कथा, साधनसंपत्ती, परंपरा किंवा एखादी अशी व्यक्ती दडलेली आहे. ती त्यांना खास बनवू शकते. एखादी व्यक्ती ती क्षमता ओळखते, तेव्हाच खरा चमत्कार घडतो. फंडा असा की – भारताचा पुढचा चमत्कार दिल्ली, मुंबई किंवा बेंगळुरूमधूनच सुरू होईल असे नाही. तो एखाद्या गावातूनही सुरू होऊ शकतो—कारण तिथे कुणीतरी वेगळे स्वप्न पाहण्याचे धाडस केलेले असते.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!