एन. रघुरामन यांचा कॉलम:प्रत्येक विषयासाठी ‘लिव्हिंग म्युझियम’ उभारता येऊ शकेल
शालेय विद्यार्थ्यांसाठी बारावीपर्यंतचे बहुतांश उच्च शिक्षण संस्थांचे जग जवळपास अनोळखीच राहते. सामान्यपणे प्रवेशाच्या वेळीच ते प्रथमच महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या परिसरात जातात. कल्पना करा- हेच विद्यार्थी पाचवीपासून किंवा त्याही आधी महाविद्यालयांच्या परिसरात जाऊ लागले तर? तुम्ही विचाराल त्यांनी तिथे का जावे? माझे उत्तर असेल – संग्रहालय पाहण्यासाठी. महाविद्यालय किंवा विद्यापीठाचा संग्रहालयाशी काय संबंध, असा प्रश्न पडू शकतो. त्याचे उत्तर पुढे आहे. तुम्ही काही शहरी मुलांना विचारले की भाज्या कुठून येतात? तर ती निरागसपणे फ्रिजकडे बोट दाखवतील किंवा सुपरमार्केटमधून अथवा विविध ॲपच्या वितरण कर्मचाऱ्यांमार्फत त्या मिळतात असे सांगतील. पण तुम्ही बेंगळुरू येथील गांधी कृषी विज्ञान केंद्रातील उद्यानविद्या महाविद्यालयाने उभारलेले पीक संग्रहालय पाहिले तर उत्तर वेगळे असेल. हा अनुभव विद्यार्थ्यांना असे बरेच काही शिकवू शकतो. ते पाठ्यपुस्तकांनाही अजून पूर्णपणे साध्य झालेले नाही. झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे मुलांमध्ये अन्न उत्पादन व त्याच्या वापराबाबतची समज कमी होत चालली आहे हे तुम्हालाही मान्य करावे लागेल. जेवणाच्या ताटातच भाज्या पाहण्याऐवजी या संग्रहालयात मुले त्यांच्यामध्ये फिरू शकतात. ती टोमॅटोच्या रोपाला स्पर्श करू शकतात, पालेभाज्या तोडू शकतात आणि अन्न त्यांना वाटते तिथे नव्हे, तर दुसरीकडे तयार होते हे समजू शकतात. हळूहळू त्यांना कळते की अन्नाची सुरुवात माती, बियाणे, सूर्यप्रकाश, पाणी आणि शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमातून होते. येथे विद्यार्थी अन्नाचा संपूर्ण प्रवास समजू शकतात – बियाण्यांची निवड आणि पेरणीपासून सिंचन, परागीकरण, कापणी, साठवणूक, वाहतूक आणि अखेरीस स्वयंपाकघरापर्यंत. या प्रवासात त्यांची गांडुळे, मधमाशा, कंपोस्ट खड्डे, औषधी वनस्पती आणि देशी पिकांच्या जातींशीही ओळख होते. कोणत्याही परीक्षेशिवाय हा अनुभव जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र, पोषणशास्त्र आणि अर्थशास्त्र शिकवतो. आता प्रश्न असा आहे की विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी केवळ पीक संग्रहालयापुरतेच का थांबावे? एखादे अभियांत्रिकी महाविद्यालय नवोपक्रम उद्यान तयार करू शकते. तेथे विद्यार्थी सायकल चालवून वीज निर्माण करतील. छोटे पूल बांधतील, पाण्याचे पंप चालवतील, विविध उपकरणांवर प्रयोग करतील आणि प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या प्रदर्शनांमधून रोबोटिक्स समजून घेतील. तेव्हा भौतिकशास्त्र हा भीतीदायक नव्हे, तर आनंददायी विषय बनेल. एखादे वैद्यकीय महाविद्यालय हृदय, फुप्फुसे आणि मेंदू यांच्या विशाल चालत पाहता येणाऱ्या प्रतिकृती असलेले मानवी शरीर शोध केंद्र उभारू शकते. परस्परसंवादी प्रदर्शनांच्या माध्यमातून हातांची स्वच्छता, पोषण, लसीकरण, प्रथमोपचार आणि अवयवदान यांसारख्या गोष्टी शिकवता येतील. त्यामुळे रुग्णालयांची भीती वाटण्याऐवजी विद्यार्थ्यांना स्वतःचे शरीर कसे कार्य करते हे समजेल. विधी विद्यापीठे संविधान संग्रहालय उभारू शकतात. तेथे तरुण अभिरूप न्यायालय, बालसंसद आणि हक्क व कर्तव्यांवरील चर्चांमध्ये सहभागी होतील. लोकशाहीची खरी समज प्रत्यक्ष सहभागातूनच अधिक चांगल्या प्रकारे विकसित होते. व्यवस्थापन शिक्षण संस्था उद्योजकता संग्रहालय उभारू शकतात, जे असामान्य उद्योग उभे करणाऱ्या सामान्य भारतीयांच्या कथा सांगेल. उदाहरणार्थ, रस्त्याच्या कडेला असलेले छोटे खाद्यपदार्थांचे दुकान मोठ्या उपाहारगृह साखळीत कसे रूपांतरित झाले किंवा ग्रामीण महिलांनी यशस्वी सहकारी संस्था कशा उभारल्या. येथे विद्यार्थी छोट्या उद्योगांचे व्यवस्थापन, अर्थसंकल्प तयार करणे आणि कल्पना कंपनीत कशा रूपांतरित होतात हेही शिकू शकतील. ही कल्पना नवीन नाही. अशी अनेक उदाहरणे आधीपासूनच आहेत. उदाहरणार्थ- अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एक्सप्लोरेटोरियममध्ये प्रकाश, ध्वनी, गती, मानवी वर्तन व अभियांत्रिकीशी संबंधित शेकडो परस्परसंवादी प्रदर्शने आहेत. त्यामुळे विद्यार्थी पाठांतर करण्याऐवजी प्रश्न विचारू शिकतात. ब्रिटनमधील हॅलिफॅक्स येथील राष्ट्रीय बाल संग्रहालयात अभ्यागत चौकोनी चाकांची सायकल चालवतात, भूमितीय रचना तयार करतात. विशाल कोडी सोडवतात आणि निसर्ग तसेच स्थापत्यशास्त्रात दडलेले नमुने शोधतात. गणिताला केवळ सूत्रांचा संग्रह न मानता हे संग्रहालय दाखवते की संख्या खेळ, संगीत, अभियांत्रिकी, वित्तव्यवस्था आणि दैनंदिन जीवनावर कशा परिणाम करतात. आणखी एक प्रभावी उदाहरण म्हणजे टोकियो येथील पासोना समूह. या संस्थेने जगातील सर्वांत वेगळ्या कार्यस्थळांपैकी एक उभारले आहे. त्यांच्या कार्यालयीन इमारतीत भातशेती, भाजीपाल्याच्या बागा, फळझाडे व मातीविरहित शेतीची केंद्रे उभारण्यात आली आहेत. फंडा असा की महाविद्यालयांनी असे अनुभवात्मक संग्रहालय उभारले. तेथे शालेय विद्यार्थ्यांना एका दिवसासाठी विविध व्यावसायिकांच्या भूमिकेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल तर शालेय विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये ही सर्वांत आवडती ठिकाणे बनतील.
