एन. रघुरामन यांचा कॉलम:लोकांच्या मनात तुम्ही कसे ‘अनफर्गेटेबल’ बनू शकता?
रामायण मध्ये वर्णन केलेल्या निषादराज गुह यांच्याकडून कोण कोण प्रेरणा घेऊ शकते, ज्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांना नदी पार करून दिली? आधुनिक काळात गुह यांच्यासारखे नावाडीच बनणे गरजेचे नाही. ते पूलदेखील बांधू शकतात. जर ते असे करत असतील तर लोकांना नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंतच पोहोचवत नाहीत, तर शेतकऱ्याच्या उत्पादनालाही जवळच्या बाजारापर्यंत पोहोचवतात, जेणेकरून तो कुटुंबाला मदत करू शकेल, एखादा विद्यार्थी पुढच्या गावातील शाळेत जाऊ शकेल आणि एखाद्या गर्भवती महिलेला उत्तम वैद्यकीय उपचार मिळू शकतील. हेच काम पद्मश्री गिरीश भारद्वाज यांनी केले होते. 1989 मध्ये बेंगळुरूपासून 300 किमी दूरच्या त्यांच्या अलेट्टी या जन्मगावचे लोक त्यांच्याकडे आले व पुढच्या गावापर्यंत पूल बांधण्याची अनोखी विनंती केली. लहानपणी भारद्वाज यांना थेट पाचवीत प्रवेश घ्यावा लागला होता, कारण कोणताही मुलगा इतके लांब चालत जाऊन नदी पार करू शकत नव्हता. कदाचित त्यांनाही गुह यांची आठवण आली असेल. भारद्वाज म्हणाले, ‘मी कधीही पूल बांधला नाही.’ तरीही ग्रामस्थ म्हणाले की ‘तुम्ही इंजिनिअर आहात, मार्ग काढाल.’ आणि मग त्यांनी ते आव्हान स्वीकारले. स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्य, लोकसहभाग आणि सोप्या इंजिनिअरिंग तत्त्वांचा वापर करून त्यांनी कमी खर्चातच पूल बांधला. ही बातमी नदीच्या प्रवाहापेक्षाही वेगाने पसरली. लवकरच देशभरातून सरकारे व समुदाय त्यांना बोलावू लागले. भारताचे ‘ब्रिज मॅन’ म्हणून प्रसिद्ध भारद्वाज यांचे या मंगळवारी 76 व्या वर्षी निधन झाले. परंतु ग्रामीण भारतात त्यांनी बांधलेले 140 हून अधिक सस्पेन्शन पूल आजही इंजिनिअरिंगपेक्षाही मोठी कहाणी सांगतात. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यापक समस्येवर तोडगा काढता, तेव्हा ओळख आपोआप तुमच्या मागे येते, याची ते आठवण करून देतात. भारताचा इतिहास अशा उदाहरणांनी भरलेला आहे. ई. श्रीधरन यांचेच उदाहरण घ्या, ज्यांनी लाखो लोकांना ती गोष्ट दिली, जी सर्वात ताकदवान लोकही देऊ शकत नाहीत- वेळ. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या शहरांना भव्य इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा अधिक कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीची गरज आहे, हे त्यांनी ओळखले. कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रो यांसारखे प्रकल्प असामान्य वेगाने व प्रामाणिकपणे पूर्ण करून त्यांनी शहरी वाहतुकीचे चित्रच बदलून टाकले. आज लाखो लोक ट्रॅफिकमध्ये कमी अडकतात, सुरक्षित प्रवास करतात आणि उत्तम जीवनाचा अनुभव घेतात, कारण एका इंजिनिअरने वाहतुकीच्या समस्येच्या निराकरणावर लक्ष केंद्रित केले. अशा लोकांची यादी खूप मोठी आहे. डॉ. वर्गीस कुरियन यांनी धवल क्रांतीचे जनक होण्याचे ध्येय ठेवले नव्हते. त्यांनी केवळ ग्रामीण भारताच्या एका मोठ्या समस्येवर तोडगा काढला की, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा. लाखो लोकांना याचा लाभ मिळाला आणि सन्मान आपोआप मिळाला. डॉ. बिंदेश्वर पाठक पुरस्कारांच्या मागे धावले नाहीत. त्यांनी सुलभ शौचालयांच्या माध्यमातून स्वच्छतेच्या संकटावर मात केली. लाखो लोकांना सन्मानजनक जीवन दिले आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत देशाचा दृष्टिकोन बदलला. अरुणाचलम मुरुगनाथम यांनीही आपल्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळेल, असा विचार कधीच केला नव्हता. त्यांनी एका दुर्लक्षित समस्येकडे लक्ष दिले- ग्रामीण महिलांना स्वस्त सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देणे. त्यांच्या या नवनिर्मितीने असंख्य कुटुंबांचे आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका बदलून टाकली. आणि या यादीत राजेंद्र सिंहदेखील आहेत, ज्यांना भारताचे वॉटरमॅन म्हटले जाते. पाण्याची टंचाई गावे आणि लोकांची उपजीविका उद्ध्वस्त करत आहे, हे त्यांनी समजून घेतले. केवळ मोठ्या धरणांवर अवलंबून राहण्याऐवजी त्यांनी पारंपरिक जलसंधारण तंत्रांचे पुनरुज्जीवन केले आणि नद्या तसेच भूजलपातळी पूर्ववत करण्यासाठी समुदायांना एकत्र केले. त्यांच्या प्रयत्नांनी राजस्थानच्या हजारो गावांमध्ये नवसंजीवनी दिली. जेव्हा स्थानिक लोक पर्यावरणीय आव्हाने सोडवण्यात भागीदार बनतात, तेव्हाच शाश्वत विकास यशस्वी होतो, हे त्यांनी सिद्ध केले. या सर्व उदाहरणांमध्ये एक तत्त्व समान दिसते- लाखो लोकांना प्रभावित करणारी समस्या ओळखा, तिच्या निराकरणासाठी स्वतःला समर्पित करा. जेव्हा एखादा शिक्षक मुलांना शिक्षणाशी, एखादा डॉक्टर गावाला आरोग्यसेवेशी, एखादा उद्योजक शेतकऱ्यांना बाजाराशी, एखादा इंजिनिअर तंत्रज्ञानाला सर्वसामान्यांशी, किंवा एखादी व्यक्ती आशेला संधीशी जोडते, तेव्हा सर्वात जास्त लोकांचे जीवन कुणी सुधारले, हे जग नेहमी लक्षात ठेवते. फंडा हा आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गरजेचा असा पूल बांधते, तेव्हा लोक त्याचा व्यवसाय विसरून जातीलही, परंतु त्याला खूप दीर्घकाळ लक्षात ठेवतात.
