July 16, 2026

बलराज संघई यांचा कॉलम:कालप्रमाण निसर्ग सिद्ध असते; वेळेपूर्वीचा हव्यास टाळा

0
balraj-sanghai_1783505805.jpg

जे आज मिळाले नाही, ते आत्ताच मिळावे. जे उद्या मिळायचे असते ते ही आजच मिळावे. जे वेळेने तयार केले नाही त्याची ही प्राप्ती व्हावी. असा निसर्गामध्ये फक्त मनुष्याला हव्यास असतो. आज पृथ्वीचा पोटात बीज रोवले आणि उद्या काढून पाहिले की अंकुर फुटला कां नाही? परत दररोज पहिले, तर ते व्यर्थ दवडले जाईल. प्रत्येक निर्मिती ला योग्य वेळ आणि संधी दिली तरच वेळेत योग्य प्राप्ती होत असते. निसर्गाचा, पृथ्वीचा पर्यायाने काळाचा एक नियम असतो. प्रत्येक निर्मितीसाठी पुरेसा वेळ द्यावा लागत असतो. अर्थात योग्य वेळेपूर्वी निर्मिती होत नसते आणि म्हणूनच घाई करुन प्राप्तीचा प्रयत्न करु नये. याचा अर्थ, प्रयत्न, कष्ट, मेहनत करू नये किंवा आपल्या उत्कृष्ट ध्येया प्रती उदासीन रहावे असा नव्हे. निसर्गाचेच पहा : सूर्य त्याच्या वेळेवर उगवतो तुम्ही वाट पहा अथवा नका पाहू, तुम्ही प्रार्थना करा अथवा नका करू. कळीचे फुल योग्य वेळ झाल्यावरच उमलते. कुठल्याही झाडाला त्याची फळे यायला योग्य मोसमच लागतो. मोसमा पूर्वी नैसर्गिक पद्धतीने कधीही फुलं, फळं येत नाहीत. मूल थोडेसे मोठे झाल्यावरच त्याला वयानुसार योग्य तशी समज यायला लागते. सूर्य त्याच्या वेळेनुसार मावळतो. प्राणी पक्षी वेळेनुसार घराकडे जातात. पावसाळ्यात पाऊस पडतो, नद्या,नाले,ओढे वाहू लागतात. योग्य मोसमातच काही पक्षी प्राणी स्थलांतर करतात. चंद्रही त्याच्या वेळेनुसारच दिसायला लागतो. चांदणं दिसायलाही योग्य वेळच लागते. शितल शांतता मध्यरात्रीनंतरच येते. पहाट वेळेनुसार होते. पाखरांची किलबिल वेळेवरच सुरू होते. सर्व गोष्टी, उत्पत्ती आणि निर्मितीची प्रक्रिया ही काळाशी संबंधित आहे. अर्थात कालप्रमाण निसर्ग सिद्ध आहे. ते बद्ध आणि नियमशीर आहे. या सर्वांमध्ये घाई फक्त मनुष्याला असते. कोणता प्राणी झाडाला फळे लागल्याशिवाय झाडाखाली उड्या मारत नाही. तसेच कोणताही पक्षी झाडाला फळे आल्याशिवाय तेथे जाऊन खाद्य मिळण्याची अपेक्षा करत नाही. मग माणसानेच कोणत्याही वस्तूची नियमापूर्वी प्राप्तीची अपेक्षा का करावी? घाई मध्ये माणूस नेहमीच नक्कीच चुकत असतो. माणूस या साठी चुकतो की त्याला लोभ, मोह, वासना, स्पर्धा, प्राप्तीची इच्छा, संग्रह, ख्यातीमोह, मोठेपणा, गर्व,अहंकार या अनेक प्रकारच्या प्रवृत्ती असतात. अर्थातच या संस्कार, साधना आणि अज्ञानामुळे प्रत्येकात कमी अधिक प्रमाणात दिसून येतात. कोणात कोणती प्रवृत्ती अधिक तर दुसरी प्रवृत्ती थोडीशी कमी. मात्र या सर्व प्रवृत्ती सर्व व्यक्तींमध्ये दिसून येतात. व्यक्ती अवेळी प्राप्तीचा व्यर्थ आटापिटा करतो. त्यामध्ये तो स्वतःचे मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक स्वास्थ्य हरवून बसतो. त्याच्या या हव्यासाचे, लोभ-मोहाचे विपरीत परिणाम मात्र समाजाला भोगावे लागतात. आपण संग्रह केला की कुठेतरी त्याची उणीव निर्माण झालेली असते. मोठ्या प्रमाणावर वस्तू दाबून ठेवल्या की बाहेर त्याची किंमत महागाई वाढलेली असते. म्हणूनच आज या ठिकाणी इतकेच व्यक्त व्हायचे आहे की निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालावे, निर्मितीच्या प्रक्रियेला वेळ द्यावा, वेळेपूर्वी प्राप्तीची इच्छा नको. ध्येयप्राप्ती साठी मात्र कष्ट, मेहनत मार्गक्रमण चालू असावे. रोजची कर्तव्य रोजच करावीत. परंतु नको त्या गोष्टीचा हव्यास नको. निसर्ग नियमांनुसार, विश्वाच्या व्यवस्थेनुसार काही गोष्टी वेळेवरच मिळत असतात यावर विश्वास असावा. (संपर्क- 9420015108)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!